मूकबधिर विद्यालयात निरोप व गुणगौरव समारंभ साजरा
वरोरा(प्रती)दिनांक 5 एप्रिल 2023 ला आनंद मूकबधिर विद्यालयातील ' वर्ग 7 चा निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा ' आनंदप्रद वातावरणात संपन्न झाला. इयत्ता 7 वी नंतर कर्णबधिर मुलांना आम्ही थेट परीक्षा योजनेच्या माध्यमातून 10 वीच्या बोर्ड परीक्षेला बसवित असतो. त्यामुळे शाळेतील हे त्यांचे शेवटचे वर्ष ठरते व त्यांना वसतिगृहामधून निरोप दिला जातो. या पुढील शिक्षणासाठी म्हणजेच आय. टी. आय. व वर्ग 10 ते 12 पर्यंत आनंदवनातीलच संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा येथे राहणार आहेत. या प्रसंगी इयत्ता 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा फोटो व मोठे घड्याळ भेट दिली. मूकबधिर विद्यालयात बालवर्गात आलेली बालके आज 16/17 वर्षाची झाली आहेत. घरच्यापेक्षा जास्त काळ ही मुले आमच्या सानिध्यात होती . त्यामुळे सहाजिकच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहातील प्रत्येक कर्मचारी वर्गाचा जीव या विद्यार्थ्यावर असतो. प्रवेशाच्या पाहिल्या दिवशी मी वसतिगृहात रहाणार नाही म्हणून रडून रडून आकांत घालणारी मुले हळूहळू शाळेत चांगली रुळायला लागतात. आमचे मूल स्वतः जेवण सुद्धा करत नाही तेव्हा वसतिगृहात कसे राहील ह्या विचाराने ग्रासलेले पालक प्रवेशानंतर काही दिवसांनी जेव्हा त्याला भेटायला येतात. तेव्हा पाहतात की, घरी स्वतःच्या हातानेही न जेवणारे त्यांचे मूल, आमच्या वसतिगृहात स्वतः च्या हाताने जेवण ही करतात आणि जेवणाचे ताट ही धुतात. आनंदवनातील प्रत्येक शाळेत शिकणार्या मुलांना शिक्षणाबरोबरच, श्रमाचेही चांगले संस्कार दिल्या जातात. त्यामुळे भविष्यात येथून शिक्षण घेऊन जाणारी मुले निश्चितच चांगली प्रगती करतात व समाजातील जबाबदार नागरिक बनवतात. आजच्या या निरोप समारंभाला अध्यक्ष म्हणुन आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय भसारकर सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. तांदूळकर मॅडम, (पोलीस उपनिरीक्षक) वरोरा पोलीस स्टेशन, संधी निकेतन अपंगांची कर्मशाळाचे अधीक्षक श्री. रविंद्र नलगिंटवार सर ,आनंद अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सेवकराम बांगडकर सर, माजी विशेष शिक्षक श्री. दीपक शिव, माजी सामाजिक कार्यकर्ता श्री. गुलाब शेंडे हे उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. वर्षभर झालेल्या विविध स्पर्धेचे यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. याची जबाबदारी श्री. रविंद्र मसराम यानी पहिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश घुलक्षे यानी केले तर साईन लॅंग्वेज च्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम सौ. शुभांगी कडू व श्री रविकांत घोलप यांनी केले . वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांच्या निरोप व गुणगौरव सोहळ्याला संस्थेचे सचिव मा. विकास भाऊ व भारती आमटे, मा.कौस्तुभ आमटे,सौ.पल्लवी आमटे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
0 Comments