मणिपूर घटनेतील नराधमांना फाशी द्या : नर्मदा बोरेकर



महिलांचा आक्रोश मोर्चा 

मणिपूर घटनेतील नराधमांना फाशी द्या : नर्मदा बोरेकर 



वरोरा (प्रती )
वरोरा येथील  रणरागिणी ग्रुपने आक्रमक भूमिका घेतली असुन सर्व पक्षीय महिलांनी  रणरागिणी ग्रुप तर्फे प्रामुख्याने शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे महिलांचा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनवर आज धडकला. नराधमांना फाशी द्या अशी मागणी करण्यात आली. महिला मध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी तात्काळ आरोपींना शिक्षा ठोठावली पाहिजे, असे मत नर्मदा दत्ताभाऊ बोरेकर यांनी मांडले. 

'एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढावो' हे सरकार म्हणते पण महिलांची सुरक्षा, महिला अत्याचार यावर ठोस पावले उचलल्या जात नाही. आक्रोश मोर्चा काढून महिलांनी तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन दिले. मणिपूर घटना ही देशाच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे. या देशात महिला राष्ट्रपती असून महिलावर अत्याचार होत आहे. ज्या प्रकारे मणिपूर येथे हिंसा घडली ती अत्यंत निंदनीय प्रकार असून त्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा. महिला व बालकल्याण मंत्री यांनी तात्काळ महिला सुरक्षा संबंधि ठोस पावले उचलावीत. सध्या आपल्या देशात अतिशय भयानक आणि मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहे. मणिपूर मधील महिलांची एका विकृत जमावाने निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्या अब्रूची जी लक्तरे वेशीवर टांगली आहे त्यामुळे देशात प्रचंड आक्रोश आणि संताप आहे. सोशल मीडियावर करोडो लोक आपल्या संतापजनक भावना व्यक्त करीत आहे. मेंदू काढून टाकलेल्या झुंडीने केलेले हे भयानक कृत्य भारतीय समाजाला आणि संस्कृतीला लाजविणारे आणि मान खाली घालायला लावणारे आहे. आपण एक महिला आहात. एका महिलेचा मान, सन्मान, प्रतिष्ठा, इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. मणिपूरच्या महिलांच्या बाबतीत जी घुणास्पद आणि लज्जास्पद घटना घडलेली आहे त्याबद्दल तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments